Pages

Wednesday, November 30, 2011

कुठून पोचलो इथे

कुठून पोचलो इथे
कुठे इथून जायचे
तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे ||

जरा वसंत दे मला
जरा उसंत दे मला
राहिले फुलायचे
भरून श्वास घ्यायचे
तुला दुरावलो तरी... ||१||

धुक्यात पाहिले खुळे
उन्हात स्वप्न संपले
मनातल्या धुक्यामध्येच
अर्थ सापडायचे
तुला दुरावलो तरी... ||२||

- नचिकेत जोशी (१०/४/२०११)

Thursday, November 24, 2011

धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...

ढाक-बहिरीबद्दल चिक्कार ऐकलं होतं. सह्याद्रीमधला एक अवघड, थरारक ट्रेक ते शेवटच्या टप्प्यात भल्याभल्यांची XXX फाटते इथपर्यंतचे किस्से ऐकले होते. "रॉकपॅचवर स्वत:चेच ठोके स्वतःला ऐकू येतील इतके घाबरलेलो असतो आपण", "पाय नीट ठेवला नाही तर खाली दरी 'आ' करून तयारच असते, सो, ओन्ली वरी अबाऊट दॅट!" इ. इ. इ.





काही दिवसांपूर्वी "ऑफबीट"वाले (आम्ही XXXवालेच म्हणतो, पद्धत आहे तशी!) ढाकला ट्रेक नेत आहेत असं कळलं. मग काय! जायचं ठरवून टाकलं! सह्याद्री एक्सप्रेसमधल्या त्या अविस्मरणीय प्रवासानंतर लोणावळ्याला स्टेशनच्या विरुद्ध बाजूला उतरलो तेव्हा साडेआठ वाजले होते. हवेत उबदार गारवा होता. ट्रेन गेल्यावर प्लॅटफॉर्म वर चढलो आणि डावीकडून आलेल्या मकरंद आणि तुषारने (त्यांची ओळख नंतर झाली) 'ऑफबीट का?' असा प्रश्न टाकला. ट्रेकर लोकांचं हे एक बरं असतं! अजिबात ओळख नसतानाही 'आपलं ध्यान' त्यांना बरोबर ओळखता येतं!

"चला लवकर, ट्रेन सुटेल ३ नं वरून" - मग त्यांच्याबरोबर मी प्लॅ.क्रं ३ कडे (पुढचे तिकीट न काढताच) धावलो. ठरलेल्या वेळेपूर्वीच सर्व जमल्यामुळे एक ट्रेन आधीच निघणे, कामशेतला पोचणे, तिथून रंगोली ढाब्यावर बसने येणार्‍या तिघांची वाट पाहत नवीन कराव्याशा वाटणार्‍या ट्रेकच्या (हवेतल्या) गप्पा करणे इ इ सर्व गोष्टी यथासांग पार पडल्यावर पुढे निघालो.



ढाकला जायला जवळजवळ ८ ते १० वेगवेगळ्या वाटा आहेत. सर्वात सोपी वाट - आम्ही जाणार होतो ती - जांभिवली मार्गे. कामशेतहून शेवटची एसटी सायं ६ ची आहे. रात्रीच्या या प्रहरी आमच्यासाठी "हर सफर मे कहानी है" असं ढाकसाठी तरी सार्थ ब्रीदवाक्य असणारी टाटा मॅजिक उभी होती. ७ आसनक्षमतेच्या त्या गोंडस, नीटस आकाराच्या गाडीत एक तास आम्ही १२ जणांनी तुफान येंजॉय केला. डायवर, त्याच्यासोबत एक माणूस, मी आणि अजून एक ट्रेकमेट - राकेश, पुढे बसलो होतो. त्या एवढ्याशा जागेत मी आधी त्या अशिष्टंटच्या मांडीवर बसून पाहिलं. मग काचेजवळ रस्त्याकडे पाठ करून बसून पाहिलं. "टोचायला" लागलं म्हणून मग मुडपून खाली फतकल मारली. जरा वेळाने माझ्या पायापाशी गरम लागायला लागलं. हेडलाईटचा आतला भाग असेल म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं, पण शेवटी न राहावून डायवरला विचारलं.
"इंजिन आहे ते!" - मी उडालोच! टाटा मॅजिकच काय पण कुठल्याही चारचाकीची इंजिने कुठे असतात याच्याशी माझा तसा काहीच संबंध नव्हता. इंजिनाशी डील करण्याचा प्रश्न कधी आलाच नाही - अभ्यासातही नाही, आणि रोजच्या लोकलप्रवासातही नाही! पण आता ऑप्शन नव्हता. मग कसंतरी पाय आखडून घेतले आणि अंताक्षरी गात बसलो.

त्या सुनसान खडबडीत रस्त्यावरून जांभिवली गावात पोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. मग पिठलं-भाकरीचं जेवण, ओळखपरेड झाल्यावर प्रीती-झीनत-राजस(लीडरलोक्स)यांनी सूचना दिल्या. ढाकच्या वाटेवर रानामध्ये उघड्यावर मुक्काम करायचा होता. जांभिवलीतून कोंडेश्वर महादेवाला डाव्या हाताला ठेवून डोंगराच्या धारेने चढून जायचे. वर पोचलो की डाव्या हाताला मांजरसुंभ्याचा डोंगर, समोर दूरवर खालच्या अंगाला सांडशी-कर्जत ही गावे दिसतात आणि उजव्या हाताला ढाकचा डोंगर दर्शन देतो. आम्ही रात्री चढत असल्यामुळे त्याचे फोटो घेता आले नाहीत. मुक्कामाची जागा ब्येष्ट होती. झाडोर्‍यात मध्यभागी एका सपाट जागेवर पथार्‍या पसरल्या. कृष्णपक्ष असल्यामुळे रात्री अडीच वाजताही चंद्राचा पत्ता नव्हता. शेकोटी पेटवली आणि साडेचारपर्यंत गप्पा 'टाकल्या'. या ट्रेकमध्ये निम्मे लोक्स ट्रेक्सवर मनापासून प्रेम करणारे असल्यामुळे गप्पा भुतांच्या अनुभवांपासून सुरू होऊन, सह्याद्रीतल्या जुन्या अविस्मरणीय ट्रेक्सवर येऊन थांबल्या. बाकीच्यांनी दुसरी पंगत मांडून गाणी म्हणून घेतली.



अखेर 'दोन तास तरी झोप घ्या' असा 'आदेश' आल्यामुळे शेकोटी तशीच ठेवून अंथरूणावर आडवे झालो. मध्येच कधीतरी सॅकमधून जर्कीन काढून घातल्याचे आठवते. त्याच वेळी समोरच्या झाडाच्या फांद्यांमधून चांदोबाने कोरभर दर्शन दिले. आजूबाजूच्यांचा घोरण्याचा आवाज सोडला तर बाकी जंगल शांत होते.

मुक्कामाची जागा -


अगदी घरच्यासारखं झोपायचं, ट्रेक असला म्हणून काय झालं? ;)


साडेसहा वाजता जाग आली तेव्हा झुंजुमुंजू की काय म्हणतात ते होऊन गेलं होतं. दिसण्याइतपत उजेड होता. आटोपून, नाष्ता करून, जागा स्वच्छ करून साडेसात वाजता बहिरीच्या गुहेकडे निघालो, तेव्हा सगळीकडे कोवळे उन्हं पसरली होती. ढाक-बहिरीचा खरा ट्रेक आता सुरू होणार होता.

ढाकचा किल्ला हा एक दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. साधारण २७०० फूट उंच, एक-दीड किमी लांब आणि बराच रूंद अशा या किल्ल्याच्या पोटात बहिरीची पश्चिमाभिमुख गुहा आहे. त्यामुळे माध्यान्हीच्या आत उतरून खाली यायचे होते. साधारण अकरानंतर कातळांवर सूर्य येतो आणि मग हाताला चटके बसतात. गुहेकडे पाठ केली की समोर सरळसोट दरी, त्याखाली पठार, मग पुन्हा कडा, पुन्हा पठार आणि सर्वात खाली सांडशी गाव. ढाकच्या शेजारी डाव्या हाताला कळकरायचा सुळका आहे. त्या पलिकडे साधारण काटकोनात मांजरसुंभ्याची रांग. त्याच रेषेत दूरवर राजमाची किल्ल्याची आडवी जोडगोळी. रेल्वेतून जाताना दिसणार्‍या राजमाची किल्ल्याची बरोब्बर विरूद्ध बाजू इथून दिसते! पहिल्या नजरेत आवडून जावं असं हे रांगडं सौदर्य आहे! (तसं बघायला गेलं तर अशी ब्यूटी सह्याद्रीत जागोजागी आहे!).

ढाक आणि कळकराय या दोघांमधल्या बेचक्यातून एक वाट खाली उतरते आणि ढाकच्या कड्याला समांतर (म्हणजेच १००० फूट खोल दरीलाही समांतर) उजवीकडे सरकते. ही वाट पूर्णपणे कातळावरून आहे. अधेमधे खाचा आहेत आणि आता रोप्सही लावता येतात. शंभर एक फूट ट्रॅवर्स मारल्यानंतर वर चढायला कातळात कोरलेल्या १०-१२ पायर्‍या आहेत. वर गेलो की पुन्हा उलट दिशेने पंचवीस-तीस फुटांचा दरीला समांतर ट्रॅवर्स! आधारासाठी लोखंडी तारा लावलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात खरा थरार आहे. तिथे नव्वद अंशातला चढ सोपा व्हावा म्हणून साधारण १५ फूट उंचीचा एक बांबू बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरांवर खुट्ट्या बाहेर आल्या आहेत. त्यावर पाय देऊन वर चढायचे. हा बांबू म्हणजे खरोखर एक कौतुकाची गोष्ट आहे! बांबू संपला की, वर जरासा बाहेर झुकलेला कातळ आहे. त्यावर चढलो की स्वतःला खरेखुरे, अनुभवी ट्रेकर्स मानण्याचे सार्थक वगैरे होते - आपण फायनली गुहेत पोचतो!
अशा या नितांतसुंदर ढाक-बहिरीच्या गुहेकडे जाणार्‍या या पॅचचे काही फोटू -



ढाकचा कडा (बाजूने) -


ढाकचा कडा (खालून) - झेंडा म्हणजे गुहा!


ही वाट. या फोटोत आधारासाठी रोप्स दिसत आहेत -


कळकराय सुळका -




"वर्टिकल लिमिट!" -




बांबूवर!


बांबूच्या वरची स्टेप (ओन्ली वरी हिअर!)


ढाक-बहिरी अवघड मानला जाण्याचे कारण फक्त आणि फक्त वरील परिच्छेदातील रौद्रभीषण सौंदर्य! बाकी हा खूपच सोप्पा ट्रेक आहे. माझ्या मते, कोरड्या ऋतूमध्ये ढाक अजिबात अवघड नाही. थोडीशी एकाग्रता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने रोप्स, तारांचा आधार न घेताही बांबूपर्यंत पोहोचता येते (खोटं नाय बोलत, मी पोचलो होतो). बांबू पार करताना मात्र अधिक काळजी घ्यायला हवी. खाली उतरल्यावर ढाक-बहिरीमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या ज्या कहाण्या ऐकल्या त्यापैकी बर्‍याचशा त्या बांबूच्या शेवटच्या टप्प्यातच झालेल्या आहेत. तात्पर्य, स्वत:ची काळजी सर्वात महत्त्वाची!

गुहेतून घेतलेले काही फोटू -




राजमाची किल्ल्याची जोडगोळी -


साडेनऊ वाजता सगळेच्या सगळे १५ जण बहिरीचा ट्रेक संपवून खाली उतरलो तेव्हा सूर्य नुकताच त्या कातळांखालच्या जंगलावर येत होता.


आमच्याकडे अख्खा दिवस बाकी होता. उतरताना सांडशीच्या वाटेने उतरावे म्हणजे नवीन वाट माहिती होईल किंवा मग ढाकचा किल्ला बघून तिथून थेट पायथ्याला गौरकामत गावात उतरावे असे दोन पर्याय होते. आपल्या माबोकर सुन्याची 'ऑफबीट' म्हणजे एकदम झक्कास काम! अनुभवी लोक्स सोबत असतील तर वाटा चुकूही देतात आणि शोधूही देतात. ;) ढाक किल्ल्याची वाट लीडरलोक्सांना नीटशी माहित नव्हती. (ढाक किल्ला ही पूर्णपणे रनटाईम वॅल्युअ‍ॅडेड ऑपॉर्च्युनिटी होती :)) तिथे भेटलेल्या एका गावकर्‍याच्या मते, ढाक पहाडाच्या मागच्या बाजूने ढाक गावाला टाळून एक वाट किल्ल्याच्या दिशेने तासभर जाते. त्यापुढे दीड एक तासाचा चढ पार केला की किल्यावर पोचतो. ढाक किल्ला हे एक विस्तीर्ण पठार आहे. तो बघायला १ तासही कमीच होता. तसेच तिथून खाली गावात उतरायला चार-एक तास लागले असते. हा सर्व विचार करून ढाक किल्ला रद्द करून आम्ही काही उत्साही लोकांनी सांडशी गावाकडे उतरण्याचे ठरवले. बाकीचे आल्या पावली झीनतबरोबर जांभिवलीकडे निघून गेले. प्रीतीला सांडशी गावात उतरायची लांबची वाट माहित होती. या वाटेवर कुठेही पाणी नाही आणि संपूर्ण वेळ सूर्य माथ्यावर असणार होता. या वाटेने कमीत कमी चार तास लागतात. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी ३ लिटर पाणी असेल तर या वाटेने जाऊ शकतो असे तिने सांगितले. त्या गावकर्‍याने उतरताना 'एका आंब्यापासून खाली उतरायला एक शॉर्टकट आहे' असेही सांगितले. त्या आंब्याजवळच एक पाण्याचा साठाही गुहेखालून लीडर प्रीतीने फोटोत कॅच केला होता. पण तो आंबा आणि ते पाणी नक्की कुठे आहे, हे शोधावेच लागणार होते. पावणेबारा वाजता २ लीडर्सबरोबर आम्ही नऊ लोक्स सांडशी 'फाट्या'वरून गावाकडे निघालो.

सांडशीकडून येताना ढाकचा डोंगर दोन डोंगरांच्या मागे आहे. अतिशय खडतर आणि दीर्घ चढ चढून यावे लागते. आम्ही उतरत असलो तरी आमचीही हालत फारशी चांगली नव्हती. कारण आम्हाला ती लांबची वाट टाळायची होती. त्यासाठी तो आंब्याजवळचा शॉर्टकट शोधायचा होता. पाऊण-एक तासात एका सपाटीवर आलो. तिथून सांडशी गाव उजव्या हाताला खाली (दूरवर) होते. कुठेतरी शार्प उजवा टर्न घ्यावा (पायवाटांचा उजवा टर्न बरं का!) लागेल हे कळत होते. पण तशी वाट सापडली नाही, म्हणून तसेच पुढे चालत राहिलो. अचानक मधूनच झाडीमागून मांजरसुभ्याच्या डोंगराने दर्शन दिले. आभाळात घुसलेल्या सुळक्यावरून जणू तो आम्हाला विचारत होता - 'या बाळांनो! सांडशी शोधता शोधता वाट चुकलात आणि थेट इथेच आलात. असेच अजून थोडावेळ चालाल तर माझ्या पायथ्याशी पोचाल. येताय का?'

आम्ही वाट पूर्ण चुकलो होतो. कारण गाव मागे राहिले होते. आम्ही वरच्या बाजूने खूप पुढे निघून आलो होतो.
मागे ढाक असा दिसत होता -


थोडा झूमून -


अखेर वाटेत लागलेले बाण तपासत पुन्हा त्या पठारापाशी आलो. अडीच वाजले होते. एका झाडाच्या सावलीत बॅगा टाकल्या.


लीडरलोक्स वाट शोधायला निघून गेले. वारा सुटला होता. रणरणत्या उन्हात ती झुळूक खूपच आनंददायी होती. वाट सापडत नाही म्हणून अखेर लीडरलोक्स परत फिरले. आता एकच पर्याय होता - थोडं अंतर अजून माघारी जाऊन आंबा शोधणे व न सापडल्यास त्या लांबच्या वाटेने उतरणे. पाणी कमी झालं होतं म्हणून त्या फोटॉवरून मी पाणी शोधायला निघालो. गंमत म्हणजे, पाण्याचा तो नव्हे, पण दुसरा एक डबकंसदृश साठा जवळच्याच ओढ्याच्या वाटेमध्ये सापडला. बाटलीच्या बुचातून रूमाल लावून पाणी भरून घेतलं आणि बाकीच्यांना येऊन ही खूषखबर सांगितली. सर्वांनी मग तिथे पाणी भरले आणि माघारी निघालो. पोटात पाणी गेल्यामुळे असेल म्हणा, किंवा झाडाखाली थोडा आराम झाल्यामुळे असेल म्हणा, पण पाचेक मिनिटांत तो आंबा सापडला, ते पाणी सापडलं आणि जवळच्या चौथर्‍याजवळून खालच्या दिशेने गेलेली एक मळलेली वाटही सापडली. त्या आनंदात तिथेच थोडं खाऊन घेतलं.

त्या आंब्यापासून केवळ वाट सापडली होती एवढंच सुख होतं. सांडशी अजूनही दोन पठारांखाली दोन तास दूर होतं. ही वाट खरंच शॉर्टकटची आहे. पहिल्या टप्प्यात सत्तर एक अंशांच्या कोनात झाडीतून ही वाट खाली उतरते. मग सांडशीच्या दिशेने समांतर ट्रॅवर्स मारून अखेरच्या टप्प्यात पुन्हा खडा उतार उतरून एका नदीपाशी ट्रेकर्सचा अक्षरशः कस पाहत ही वाट येते. उतार-उन्हं-घाम - बाकी काहीही नाही! असे प्रसंग आले की मला हमखास एक प्रश्न पडतोच - कुणी सांगितलं होते हे उद्योग करायला? आणि मग उत्तरही आपोआपच मिळतं! :) किंवा कोदापूर गावात एसटीतून उतरल्यावर कंडक्टरची कॉमेंट - "आयला! पैसे देऊन वर जीवाला त्रास" आठवते. असो. अर्थात या वाटेवर अध्येमध्ये बाण आखलेले आहेत, झाडाच्या खोडावरही खुणा आहेत. देखनेवाली नजर चाहिये बस्स! ही संपूर्ण वाट उतरताना मला सतत तोरण-रायगडच्या ट्रेकमध्ये सिंगापूरच्या नाळेने दापोलीकडे जाणार्‍या वाटेची आठवण होत होती.

नदीजवळून ढाक -


त्या नदीमध्ये मासे पकडण्यासाठी सुंदर लाकडी जाळी लावली होती. त्याच्या खालच्या अंगाला आम्ही पाणी प्यायलो. थोड्या वेळाने -
सुशील: तू ते पाणी प्यायलास का?
मी : हो.
सुशीलः मी त्या मामांना विचारलं, ते म्हणाले, या पाण्यात माशांसाठी औषध टाकलं आहे. ते पीत नाही आम्ही.
मी: (मनात कपाळावर हात मारून) आत्ता सांगतोयंस? आणि जाउ दे! ते औषध माशांसाठी आहे, माणसांसाठी नाही!

आजूबाजूला डोंगर, झाडी, पाचचा सुमार, कललेलं उन्हं, विलोभनीय शांतता आणि नदीचं इतकं सुंदर, नितळ पाणी बघून त्याचा आस्वाद न घेणं हा केवळ करंटेपणा होता! आणि आता बहात्तर तासांनीही तब्येत ठणठणीत असल्यामुळे त्यावेळी ते पाणी प्यायलं हे बरंच केलं!

सर्व प्रवास संपवून सांडशी गावात पोचलो आणि सुदैवाने लगेच सव्वापाचची यष्टीही मिळाली. मग तिथून कर्जत, कर्जतहून दादर व्हाया चहाचे कप असा कंटाळवाणा प्रवास संपवून कर्मभूमीत पोचलो तेव्हा मनात एक अवघड ट्रेक सुफल झाल्याचा आनंद घुमत होता - धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...



- नचिकेत जोशी (२२/११/२०११)

Monday, November 21, 2011

एका प्रवासाची गोष्ट

शनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या "११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस"मधल्या दोन तासांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे!

हा अलौकिक प्रवास घडायचे निमित्त होते - "ऑफबीटसह्याद्री" आयोजित समस्त ट्रेकरजनांच्या आदरास पात्र अशा "ढाक बहिरी" नावाच्या ट्रेकचे! भेटायची जागा "लोणावळा स्टेशन येथे रात्रौ ९.२० पर्यंत केव्हाही" असल्यामुळे नोकरी आटोपून मी 'सह्याद्री'ने जायचे ठरवले. वास्तविक, कोल्हापूरला जाणार्‍या "सह्याद्री"मध्ये S4 बोगीमधील रिझर्वेशन्स पुण्याहून भरली जातात. त्यामुळे पुण्यापर्यंत तिकिटावर (प्रसंगी टीसीला 'भरवून') जाता येते. पण त्या दोन दिवसांच्या खात्यावर अस्मादिकांच्या नशिबात अविस्मरणीय योग लिहिलेले असल्यामुळे S4 सोडून जनरल डब्यात शिरायची मला बुद्धी झाली.

सीएसटी ते दादरमध्येही ट्रेन पंधरा मिनिटे लेट आली. (लोणावळ्यानंतर 'चिक्कार' अनयुज्वल स्टेशन्सवर थांबत जाणारी 'सह्याद्री' ही एक 'हात दाखवा ट्रेन थांबवा' कॅटेगरीतली गाडी आहे हे चढण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर पुण्याला जाणार्‍या एक-दोन प्रवाशांशी मी बोलून घेतलेच होते.त्यांना आता आणखी उशीर झाला असता!) अगदी आरामात नाही तरी एक सीट बसायला नक्कीच मिळेल असा विश्वास वाटत होता. (नंतर कळले, तो फारच अवास्तव भाबडा होता.) शनिवार संध्याकाळ असला तरी गर्दी स्वतःच्या आटोक्यात राहिल असंही वाटलं. दादरला गाडी थांबता थांबताच चढलो. जनरल बोगीच्या दारात एक बाई वाटणारी मुलगी उभी होती. (का? - देव जाणे!) माझ्या पाठीवर ट्रेकींगची मोठी वजनदार सॅक आणि हातात अत्यंत हलकी कॅरीमॅट! नाईलाज होता. तिला रेटूनच आत शिरलो आणि जागा मिळते का शोधत जाऊ लागलो. (तिने शिव्या घातल्या नसणार याची खात्री आहे!) प्रत्येक कंपार्टमेंट खच्चून भरलेला! उजव्या बाजूच्या खालच्या आणि वरच्या बर्थवर कमीतकमी प्रत्येकी ४ माणसे बसलेली! डाव्या बाजूच्या समोरासमोरच्या सिंगल सीट्सवर प्रत्येकी एक प्रवासी आणि वर अस्ताव्यस्त बॅगा पसरलेल्या!अचानक असं लक्षात आलं की आपण त्या संपूर्ण डब्याच्या मध्यभागी अडकलो आहोत! गर्दीमुळे पुढे जाऊ शकत नाही आणि मागच्या वाटा केव्हाच बंद झाल्या आहेत.

एव्हाना गाडी सुटली होती. अचानक माझं लक्ष एका कंपार्टमेंटमधल्या सगळ्यात वरच्या बर्थकडे गेले. तिथे चक्क दोनच माणसे बसलेली होती आणि पलीकडे बॅग्स ठेवलेल्या होत्या. ही गोष्ट गर्दीच्या लक्षात आलेली नाही आणि फक्त मलाच दिसली आहे हा माझा आनंद क्षणकाळच टिकला. कारण मी जेव्हा ताबडतोब त्याला बॅग काढून तिकडे सरकायला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, "तिथल्या लाकडी फळ्या तुटलेल्या असून केवळ लोखंडी रॉडची चौकट आहे, आणि म्हणून तिथे बॅगा ठेवलेल्या आहेत!" मी विचार केला, मेरे पास वो है, जो इनमेसे किसीकेभी पास नही है - आणि ती गोष्ट म्हणजे रात्रीच्या मुक्कामात झोपण्यासाठी घेतलेली कॅरीमॅट! मग पुढच्या गोष्टी यथासांग घडल्या. पाच मिनिटांनंतर मी त्या तुटलेल्या बर्थवर होतो. माझ्या 'खाली' रॉडच्या चौकटीच्या आधारे ठेवलेली कॅरीमॅटची गुंडाळी आणि त्याखाली खालच्या बर्थवर बसलेल्या माणसाचे डोके! पुढचा बराच वेळ मला 'मी जर खाली कोसळलो तर काय?' हीच भीती वाटत होती! पण तिकडे दुर्लक्ष करून मी स्थिरस्थावर व्हायला लागलो.

माझ्या समोरच्या अप्पर बर्थचं नशीबही असंच "तुटकं" होतं. त्यामुळे तिथेही तीनच माणसे होती. मग मी माझी सॅक त्या बर्थवर ठेवून दिली. आणि मी लोणावळ्याला उतरेपर्यंत त्यावरचा माणूस तिला आपली मानून धरून बसला होता आणि मी निवांत झालो होतो. खालच्या बर्थवर एक माणूस, दोन बायका. त्या दोन बायका एकमेकींच्या कुणीतरी असाव्यात. (आपण सासू-सुना समजू). त्यांच्या शेजारी अजून दोन माणसे. माझ्या खालच्या बर्थवर कोण बसले आहे हे मात्र कळू शकले नाही, आणि पडायच्या भितीने मी वाकून बघायचा प्रयत्नही केला नाही. यात किती वेळ गेला माहित नाही, पण गाडी स्लो जात होती. कारण बर्‍याच वेळाने जेव्हा कल्याण आले असे मला वाटले, तेव्हा गाडी पारसिकच्या बोगद्यात शिरत होती.

पुढचे दोन तास खायला उठणार अशी माझी खात्री व्हायला लागली होती. वेळ कसा काढायचा हा खरंच प्रश्न होता. घड्याळ बघून झाले, मोबाईल पाहून झाले, थोडा वेळ नखंही कुरतडून झाली. ट्रेकला निघालो असल्यामुळे जवळ पुस्तकही नव्हते. आणि सॅकमध्ये हेडफोन घ्यायला विसरलो होतो. माझ्या शेजारच्या माणसाच्या कानात केव्हाच हेडफोन शिरले होते. त्या पलिकडे एक विद्यार्थी वाटावा असा एक तरूण बसला होता. तो एक जाडजूड पुस्तक वाचण्यात दंग होता. "what is cood" की असं काही तरी टायटल असलेलं ते पान मी वाचलं आणि हे "dhood" आपल्याच्याने झेपायचं नाही असं मला लगेच कळलं! माझ्या मागे असलेल्या दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये अप्पर बर्थवर वेगळी परिस्थिती नव्हती. एकंदरीत बोगीमध्ये "बघण्यासारखं" कोणीही नव्हतं आणि मीही बघण्यासारखा नसल्यामुळे कोणी माझ्याकडेही बघत नव्हतं! एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!

मी पुन्हा एकदा स्वतःची पोझिशन चेक करून घेतली. दोन्ही पाय समोरच्या बर्थच्या रॉडला टेकवले होते. कॅरीमॅटवर फक्त बूड टेकवले होते. दोन्ही हात मोकळे होते आणि त्या अवस्थेत आराम शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या इतक्या बिकट गर्दीमध्ये जेव्हा "सामोसे - वीसचे पाच" ही आरोळी ऐकली तेव्हा मात्र मी धन्य झालो! दुसर्‍या टोकाकडून तो माणूस परत येताना तीच आरोळी "दहाचे तीन" अशी झाली! मग जसेजसे कल्याण जवळ येऊ लागले, तसा तो "दहाचे चार" वर आला. त्याच्या कडून मग कुणीतरी चार सामोसे घेतले. कल्याण प्लॅटफॉर्मात गाडी शिरताना तर "दहाचे सहा"! आणि इथे त्या चार सामोसे घेणार्‍याचा आणि माझा असे दोन चेहरे भिन्न कारणांमुळे पाहण्यासारखे झाले होते! माझे "जोशी"मन एकदम जागे झाले! पण एकट्याच्याने सहा सामोसे संपणार नसल्याने मी शेजारच्याला सामोसे खाणार का असे विचारून पाहिले. (खायच्यावेळी कसली ओळख? हक्काने खायचं!) पण तो बिचारा "अनोळख्या सहप्रवाशाने दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत" या विचारांचा पाईक असावा! तो नाही म्हणाला आणि जोशींनी आपणहून ऑफर केलेल्या खाण्याची दुर्मिळ संधी हुकवता झाला! समोरच्याचा उपास होता. मग मीही सामोसे घेण्याच्या विचारांचं 'कल्याण झालं' असं मानून गप्प बसलो.

कल्याण आले तेव्हा मागच्या कंपार्टमेंटमध्ये जरा इंटरेस्टींग गोष्टी घडल्या. कल्याणला शिरलेली भयंकर गर्दी हे त्याचे मुख्य कारण! आधीच चार माणसे बसलेल्या अप्परबर्थवर जेव्हा गर्दीतला एक जण बिंधास चढला तेव्हा मग काही तुरळक शाब्दिक चकमकी वगैरे गोष्टी गर्दीची घटकाभर करमणूक करून गेल्या. खरंतर गर्दीच एवढी होती, की कुणी भांडायच्याही मूडमध्ये नव्हते. कारण इंचभर जागेवर उभं राहण्यासाठी भांडण्यापेक्षा सरळ तिथेच लोटालोटी करून जागा घ्यावी हे अधिक प्रॅक्टीकल होतं. सर्वजण तेच करत होते.

माझ्या आसपासच्या बर्थवरील सर्वांच्या कानात वायरी होत्या आणि मी हातभर अंतरावर असलेल्या आणि मला जराही वारा न देणार्‍या पंख्यांचा आवाज ऐकत होतो. तेवढ्यात त्यापैकी एका पंख्यावर ठेवलेला बूट खाली पडला आणि माझ्या गुडघ्यावर टप्पा घेऊन खालच्या माणसाच्या मांडीवर विसावला. त्याची पहिली नजरही माझ्यावर नको म्हणून मी तेव्हाच माझे दोन्ही हंटर शूज लेस तपासायच्या बहाण्याने (स्वतःचा तोल सांभाळून) माझ्या हातात धरले.

"आज गाडी लई प्यॅक आहे!" - अखेर समोरच्या बर्थवरच्या माणसाला कंठ फुटला. मला स्वतःला डोक्यात कविता-बिविता सुचत नसतील तर अबोल प्रवास अजिबात आवडत नाहीत. कानात वायरी खूपसून गाणी ऐकत प्रवास करणार्‍यातला मी नाही! त्यापेक्षा शेजारच्या अनोळख्यांशी गप्पा मारण्यातही मजा येते. मग सह्याद्री एक्प्रेस आजच कशी भरलेली आहे, इतर गाड्यांच्या तुलनेत ही किती स्लो आणि अभागी गाडी आहे इ इ विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. त्याच्या शेजारचा माणूसही थोड्या वेळाने त्यात सामील झाला. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जनरल डबे स्त्रियांनी प्रवास करण्याजोगे नसतात वगैरे सामाजिक मुद्द्यांवरही आम्ही आमची (अमूल्य) मते शेअर केली. तेवढ्यात विरूद्ध बाजूकडील वरच्या रॅकमधली एक बॅग घसरून खाली पडली. मग आम्ही "ट्रेनचे रूफ त्या रॅक्सवरतीही सपाटच असायला हवेत म्हणजे अजून ५-६ बॅगा बसतील" असा मुद्दा डिस्कस केला. खंडाळा घाटातल्या बोगद्यांमध्ये दरवाजात उभे असलेल्यांनी लहान मुले जशी ओरडतात तशा किंकाळ्या मारल्यावर तर "पहिल्यांदाच बोगदा पाहिला असणार" या त्याच्या कॉमेंटच्या टोनवर सगळेच हसलो!

माझ्या सॅकचा कंबरेला सपोर्टसाठी असलेला बेल्ट खाली लोंबकळत होता. खालच्या बर्थवरील दोघींपैकी सुनेच्या हाताला अचानकच एक टाईमपास मिळाला होता. सॅक त्या जागी ठेवल्यापासून देवळातली घंटा हलवावी तसा तो बेल्ट ती हलवत बसली होती. गप्पांमध्ये एखादा भावनिक वगैरे मुद्दा निघाला की ती तो जोरात हलवायची. कधीकधी सासूला टाळी कशी द्यायची असं वाटत असल्यामुळे ती त्या बेल्टलाच टाळी द्यायची. कल्याणनंतर तिने तो एक-दोनदा निरखून, तपासून वगैरे पाहिला! कर्जतनंतर तिने तो बेल्ट हलवणे थांबवून घट्ट धरून ठेवला आणि घाटातल्या बोगद्यांमध्ये तर तिने गप्पांच्या नादात त्याला खालून गुंडाळायला सुरूवात केली. इथे मात्र मी सावध झालो. गुंडाळायला बेल्ट कमी पडतोय असं वाटून तिने जरा जरी जोर लावला असता तर ती १०-१२ किलोची सॅक खाली आली असती. तसंही एवढा वेळ त्या बेल्टशी तिची दोस्ती झाली होतीच! पण सुदैवाने तिने तसं काहीही केलं नाही!

कर्जतनंतर तर डब्यात एवढी गर्दी झाली होती की मी खाली उतरून चालत दरवाज्यापर्यंत जाण्याऐवजी त्यांच्या डोक्यावरून सरपटत गेलो असतो तरी सहज पोचलो असतो! सुदैवाने माझ्या खालच्या बर्थची खिडकी "emergency window" होती. लोणावळा स्टेशन त्याच बाजूला येणार होते. त्यामुळे दरवाजापेक्षा तिथूनही उतरण्याचा पर्याय होता. मी माझ्या समोरच्या माणसाला हे बोलून दाखवल्यावर तो जोक समजून हसलाही! खंडाळ्याच्या आधी दुसर्‍यांदा मी त्याला तोच विचार बोलून दाखवल्यावर मात्र तो शहाण्यासारखा, 'काही गरज नाहीये, दरवाजातूनच उतरा, आरामात पोचाल' असे बजावता झाला. खालच्या माणसाला 'खंडाळा आलं की सांगा, मग उतरायला घेतो' असं सांगितल्यावर तो "कराड? त्याला लई अवकाश आहे" असं म्हणाला. खंडाळा आणि कराड यांच्या उच्चारात काय साम्य आहे माहित नाही! पण काही का असेना, त्यानंतर तो बिचारा खिडकीशी नाक लावून खंडाळ्याकडे लक्ष ठेवून बसला होता.

अखेर, घड्याळात वेळ पाहून, "आतापासून उतरायला घेऊ तर लोणावळा येईपर्यंत दरवाजा गाठता येईल" असा विचार करून अखेर त्या अधांतरी आसनावरूनखाली उतरलो. पॅसेजमध्ये भयंकरच गर्दी होती. त्यात खंडाळ्याला काही माणसे चढली. इतक्यात माझ्या शेजारच्या एका बुटुकमूर्तीला उलटीचा फील आला! आणि तो जवळच्या खिडकीशी जायचे सोडून टॉयलेटच्या दिशेने निघाला! ते सर्व ढोंग असून उलटीपेक्षा त्या गर्दीतून लाक्षणिक कलटीचा तो प्रयत्न आहे हे उपस्थितांपैकी एकाच्या लक्षात आले आणि मग त्याच्या "झेपत नाही तर खातो कशाला" या त्याच्या अस्सल शालजोडीतल्या ठसक्यावर आजूबाजूला हशा पिकला!

तात्पर्य, दोन तास कसे गेले कळले नाही. प्रचंड गर्दी, उकाडा, एकाच स्थितीत उभे राहण्याची शिक्षा इ सर्व प्रतिकूल गोष्टी असूनही माणसे निवांत होती. एक-दोन कुरबुरी सोडल्या तर त्या परिस्थितीतही हास्य-विनोद सुरू होते, वर्तमानपत्रातली कोडी सोडवण्याची तयारी होती, खाणं सुरू होतं, गंभीर चेहर्‍यांसह गप्पाही सुरू होत्या. प्राप्त परिस्थितीला अशा दृष्टिकोनातून सामोरे जाण्याचे दृश्य खूप आनंद देऊन जाते. त्या गर्दीतून हिंदकाळत, ठेचकाळत माझा इवलासा जीव सांभाळत लोणावळ्याला स्टेशनच्या विरूद्ध बाजूला उतरलो तेव्हाही एका अस्ताव्यस्त, त्रासदायक पण तरीही अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी मनात रेंगाळत होत्या आणि मी ढाकच्या तितक्यात अविस्मरणीय ट्रेकसाठी रेड्डी झालो होतो...

- नचिकेत जोशी (२१/११/२०११)

Tuesday, November 1, 2011

मागणे

(दीपज्योती दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित -
http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_581.html)


अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो

पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो

फकीर जाहलो तरी, सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो


- नचिकेत जोशी (२८/८/२००८)

एक क्षण जगण्यामधला

(मायबोली.कॉमच्या हितगुज दिवाळी अंक २०११ मध्ये प्रसिद्ध झालेली कविता. ही कविता इथेही वाचायला मिळेल -
http://vishesh.maayboli.com/node/1073)


एक रंग नभामधला
हळूच शाईत मिसळून बसला
डोळ्यांमधल्या पावसाबद्दल
नकळतपणे लिहून फसला

एक फूल बागेमधलं
खिशामध्ये मुडपून बसलं
तिची वाट बघून बघून
हिरमुसून झोपी गेलं

एक गंध वार्‍यामधला
रानोमाळ फिरत बसला
संध्याकाळी दिव्यापाशी
तुळशीमध्ये विरून गेला

एक मन देहामधलं
धाव धाव धावत राहिलं
अखेर वाट संपली, मग
पालखीमागून चालत राहिलं

एक शब्द ओळीमधला
चुकून जगण्यामध्ये आला
एक क्षण जगण्यामधला
फुटून ओळीमध्ये गेला

- नचिकेत जोशी